Login

८चा पाढा आणि आयुष्याची गोष्ट

म्हणून कदाचित आयुष्याचा खरा पाढा असा नसावा की फक्त ८ च्या पट्ट्याने पुढे जात राहायचं.तर प्रत्येक टप्प्यावर थोडं थांबून, थोडं जगून, थोडं अनुभवून पुढे जायचं.
“८ चा पाढा आणि आयुष्याची गोष्ट” लेखक: सुनिल पुणेTM 9359850065

लहानपणी आपण शाळेत बसून ८ चा पाढा म्हणत असतो ८, १६, २४, ३२ तेव्हा तो फक्त अंकांचा खेळ वाटतो. पण आयुष्याच्या प्रवासात हेच अंक हळूहळू वास्तव बनतात, आणि प्रत्येक टप्प्यावर नवी कथा लिहिली जाते.

८ व्या वर्षीचं लहानपण, निर्दोष, निरागस. ना चिंता, ना जबाबदाऱ्या. खेळ, शाळा, आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद.
१६ व्या वर्षी तरुणपणाची चाहूल लागते. स्वप्नं आकार घेतात, स्वतःची ओळख शोधण्याची धडपड सुरू होते.
२४ व्या वर्षी आयुष्य एका नव्या वळणावर येतं, नोकरी, करिअर, आणि अनेकांसाठी लग्न. जबाबदाऱ्यांची पहिली खरी जाणीव इथून सुरू होते.

३२ व्या वर्षी मुलं, कुटुंब आणि त्यांच्या भवितव्याची चिंता. स्वतःपेक्षा इतरांसाठी जगण्याची वेळ.
४० व्या वर्षी संसार स्थिर होतो, मुलं वाढत असतात, पती-पत्नी नातं अधिक परिपक्व होतं. आयुष्य थोडं समतोल वाटायला लागतं.
४८ व्या वर्षी अनेक जण समाजासाठी काहीतरी करण्याचा विचार करतात. अनुभवाचा ठेवा इतरांसाठी वापरण्याची इच्छा जागते.

५६ व्या वर्षी म्हातारपणाची चाहूल लागते. शरीर थोडं थकायला लागतं, पण मन अजूनही आठवणींमध्ये तरुण असतं.
६४ व्या वर्षी नातवंडांसोबत खेळण्याचं, त्यांच्यात पुन्हा एकदा स्वतःचं बालपण पाहण्याचं सुख, पण आजच्या डिजिटल युगात हे सुख सर्वांच्या वाट्याला येईलच असं नाही. मुलं परदेशात, नातवंडं स्क्रीनमध्ये गुंतलेली, आणि आपण? एकटेच आठवणींमध्ये रमणारे.

७२ व्या वर्षी प्रॉपर्टी वाटप, जबाबदाऱ्यांचा शेवट करण्याचा प्रयत्न. आयुष्याची गुंफलेली दोरं सैल सोडण्याची वेळ.
आणि ८० व्या वर्षी, या जगाला निरोप देण्याची तयारी.

पण या सगळ्या गणितात एक मोठा प्रश्न उभा राहतो,
आपण खरंच जगतोय का, की फक्त टप्पे पूर्ण करतोय?

आजच्या डिजिटल युगात ६४ व्या वर्षीचं नातवंडांचं सुखही अनिश्चित झालंय. नाती बदललीत, संवाद कमी झालाय, आणि माणूस तंत्रज्ञानाच्या जवळ जाताना माणसांपासून दूर जातोय. प्रत्येकाकडे वेळ आहे, पण एकमेकांसाठी नाही.

म्हणून कदाचित आयुष्याचा खरा पाढा असा नसावा की फक्त ८ च्या पट्ट्याने पुढे जात राहायचं.
तर प्रत्येक टप्प्यावर थोडं थांबून, थोडं जगून, थोडं अनुभवून पुढे जायचं.

कारण शेवटी, आयुष्य हे गणित नसतं.
ते एक अनुभव असतं, जो मनापासून जगला, तरच त्याची खरी किंमत समजते.

लेखक: सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →