Login

शेवटची वारी....

कधीही वारी न चुकवलेल्या सुमनबाईंची शेवटच्या वारीच्या प्रवासाची गोष्ट.
ज्येष्ठ महिना सुरू झाला आणि इकडे अंथरुणावर खिळून पडलेल्या सुमनबाईंना वारीचे वेध लागले.
सलग दोनदा आवाज देऊनही पाचव्या सहाव्या हाकेला त्यांची सून साधना काहीश्या त्रासिक चेहऱ्याने सुमनबाईंच्या खोलीत आली.

साधना - बोला आई काय हवंय का तुम्हाला ?
त्यावर सुमनबाईंनी चाचरतच बोलायला सुरुवात केली.

साधना अगं तू तरी समजावं गं महेशला. चार वर्षांची असल्यापासून वारी चुकली नाही. आधी माय बापाचं बोटं धरून नंतर माझ्या घर- धन्याच्या जोडीनं प्रवास केलाय त्या विठ्ठलाच्या भेटीचा.
नवरा तर गेला कधीच शेवटच्या प्रवासाला मला सोडून . निदान त्याच्या माघारी तरी मला वारीचा प्रवास घडू दे गं बाई .
बोलताना सुमनबाईंचा गळा दाटून आला.

साधना - अहो आई आम्ही काय मुद्दाम करतोय असं वाटतं का तुम्हाला ? सत्तरीच्या वर आहात तुम्ही .त्यात बीपी, शुगर, सांधेदुखीचा आजार तुम्हाला. साधी पाच मिनिटं उभे राहिल्याने तुमचे दोन्ही गुढगे दुखतात. चालताना ही आधार लागतो आणि अशा अवस्थेत वारी करायची म्हणताय????

यावर सुमनबाई निरुत्तर झाल्या.

वारकरी घराण्यात जन्मलेल्या सुमनबाईंना लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीची आवड होती.
५ वर्षांपूर्वी नवरा गेल्यानंतरही पांडुरंगाच्या नामाने , भजन कीर्तनाच्या आधारे त्यांनी स्वतःला रमवले होते . आता शरीरही हळूहळू साथ देईनासे झाले पण वारीची ओढ काय कमी झाली नाही.
हे सर्व आठवून त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू येऊ लागले .

शेवटी साधना जे बोलली तेही खरंच होतं ना.

एक दोन मिनिटं तशीच शांततेत गेली. मनाशी काहीसा निर्धार करून सुमनबाई म्हणाल्या , ठीक आहे वारीसाठी असं नाही म्हणत निदान एकादशीला गाडीने तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घडवून आण.

आपल्या आई आणि बायकोचा संवाद बाहेर हॉल मधे बसलेल्या महेश आणि त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाच्या वेदच्या कानावर पडत होता.
आपली वृद्ध आई अजूनही हट्ट सोडत नाही हे पाहून महेशच्या पाठोपाठ त्याचा लेकही आजीच्या खोलीत शिरला.

साधना - बरं झालं आलात तुम्ही . हे बघा आता आई काय म्हणतायत , वारी नाही निदान दर्शनाला तरी न्या. तुम्हीच बघा बोलून कसं काय ते.

महेश - शांत हो साधना अगं ऐकलंय तुमचं बोलणं मी. बोलतो मी आईशी.

त्यावर सुमनबाईंनी हात जोडले आणि म्हणाल्या , काहीच बोलू नकोस हवं तर माझी शेवटची इच्छा समज.
अजून उरलंच किती आयुष्य माझं ??

महेश - अगं आई जरा पाऊस बघ बाहेर. गेली ५ दिवस सतत मुसळधार कोसळत आहे . काही ठिकाणी पुरासारखीं परिस्थिती झाली आहे . अत्यंत गरजेच्या कामाशिवाय बाहेर पडू नका असा सरकारी आदेश आहे . त्यातही तू अशी आजारी . तुला कसं सोसवेल हे ? वरून दर्शनाची गर्दी वेगळीच .
ऐक माझं आता आपण सगळे दोन महिन्यांनी पंढरपूरला जाऊया . तोपर्यंत तू आराम कर.
सुमनबाईंना बोलायची संधीही न देता साधना आणि महेश खोलीच्या बाहेर पडले तर दुसरीकडे काहीच पर्याय उरला नसल्याने सुमनबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

आजीला रडताना पाहून छोट्या वेदला वाईट वाटले. त्याने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि म्हणाला आजी रडू नकोस ना .बाबा नेईल आपल्याला नंतर.

सुमनबाई - हो रे बाळा आता नाही रडायची बरं मी. सांग तुझ्या आई बाबाला नंतर जाऊ आपण .

आजीचे बोलणे ऐकून वेद खोलीबाहेर पडला. त्यालाही समजत होते जसा आपण खाऊसाठी , खेळासाठी हट्ट करतो तशीच आजी पण पंढरपूरला जायला हट्ट करतेय पण आई बाबा तिला नेऊ शकत नाहीत.

सलग पाऊस पडत असल्यामुळे वेदच्या शाळेला २-३ दिवसांपासून सुट्ट्या दिल्या होत्या तर दुसरीकडे महेश म्हणजे त्याचे वडीलही वर्क फ्रॉम होम करत होते आणि आज तर एक महत्त्वाची ऑनलाइन मीटिंग सुरू होती.
पलीकडील व्यक्ती एका प्रॉडक्टच्या उत्पादनाची पूर्ण प्रकिया , त्याची माहिती तसेच वापराचा डेमो दाखवत होती आणि त्याचे वडील तसेच ऑफिसमधील काही सहकारी मीटिंगद्वारे सर्व पाहात होते.
यावरून वेदला एक कल्पना सुचली.
तो लगेच किचनमध्ये आपल्या आईकडे गेला आणि तिला आपले विचार सांगितले.

अरेच्चा! हे आपल्याला कसे सुचले नाही ?? चला प्रत्यक्षात नाही निदान ऑनलाईन तरी सासूबाईंना वारी आणि विठुरायाचें दर्शन घडवून आणता येईल या विचाराने साधनाला हायसे वाटले.
संध्याकाळी तिने लगेच महेशला याची कल्पना दिली.
महेशलादेखील आपल्या लहानग्या वेदचे कौतुक वाटले.
त्याने लगेच ही कल्पना अंमलात आणली.
दोनच दिवसांनी सुमनबाईंच्या खोलीत एक प्रोजेक्टर लावण्यात आला.

महेश - आई आजवर तुझी वारी कधी चुकली नाही यावेळीही चुकणार नाही. प्रत्यक्षात तिथे काय घडतंय हे तू इथून पाहू शकतेस. शरीराने इथे असलीस तरी डोळ्यांनी तू वारीचा प्रवास करशील.
माझ्याकडे हाच एक मार्ग आहे .

एव्हाना सुमनबाईंना देखील आपल्या मुलाचे सुनेचे बोलणे पटले होते त्यामुळे त्यांनीही होकार दिला.

संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या, वारकऱ्यांचे चालता बोलता भान हरपून नामस्मरण करणे , एकमेकांसोबत फेर धरत अभंगाच्या, टाळ मृदुंगाच्या तालावर नाचणे ,नामाचा जप करणे , अभंग ,ओव्या म्हणणे, रिंगण नृत्य , फुगड्या वैगेरे खेळणे शिवाय एकमेकांना मदतीचा हात देणे ह्या सर्व गोष्टी सुमनबाईं पहिल्यांदाच घरच्यांसोबत मोठ्या पडद्यावर बघत होत्या.

सलग बरेच दिवस त्यांचा हा ऑनलाईन वारीचा प्रवास घर बसल्या सुरू होता . पडद्यावरचे दृश्य पाहता पाहता मधेच त्यांना आपल्या वारीतल्या जगलेल्या घटना आठवत होत्या. मायबापासोबतचा प्रवास , नंतर नवऱ्याबरोबर पहिल्यांदा आणि शेवटची केलेली वारी, नवऱ्याच्या माघारी एकटीची वारी.
पडद्यावरच्या प्रवासाबरोबर भूतकाळातील कितीतरी आठवणी आज त्या पुन्हा एकदा डोळे मिटून जगल्या होत्या.

त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून महेश आणि साधनाला ही बरं वाटत होतं शिवाय त्यांना लहानग्या वेदचेही कौतुक होते.

आणि अखेर तो एकादशीचा दिवस आला. साधना आणि महेशचं न ऐकता हट्टाने आज त्यांनी उपवास धरला होता.
साधनाने आज त्यांना कोमट पाण्याने अंघोळ घालायला मदत केली.
ते हलके गरम पाणी त्यांना चंद्रभागेच्या पवित्र पाण्याच्या स्पर्शाची आठवण करून देत होता.

सकाळपासूनच प्रसारमाध्यमांवर थेट प्रक्षेपण सुरू होते.
आज तीर्थक्षेत्र पंढरपूर नामाच्या गजराने , कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या भक्तीने, जयघोषाने फुलून आले होते.

विठ्ठल - रुक्मिणी बरोबर पुंडलिकाच्या दर्शनासाठीही रीघ लागली होती. जो तो भाविक अत्यंत संयमाने शिस्तीने दर्शन घेत होता.

सुमनबाईंचे डोळे पडद्यावर खिळले होते. अखेर तो क्षण आला. विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील थेट दर्शन सुरू झाले. सावळा विठूराया कटीवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत उभा होता.

"पांडुरंग... पांडुरंग..." या नामघोषात सुमनबाईंचे हात आपोआप जोडले गेले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

त्या भरून आलेल्या गळ्याने म्हणाल्या,
"विठ्ठला... यावेळी तुझ्या दारी येता आलं नाही. पण तूच माझ्या घरी आलास. आता कोणतीच खंत राहिली नाही रे..."

महेश, साधना आणि वेद त्यांच्या शेजारीच बसून दर्शन घेत होते. आरती सुरू झाली. सुमनबाईही मंद स्वरात आरती म्हणू लागल्या.

आरती संपताच त्यांनी डोळे मिटले. ओठांवर फक्त एकच शब्द होता...

"विठ्ठल..."

काही क्षण त्या तशाच डोळे मिटून पडून होत्या.

"आई...!" चला थोडासा फराळ करून घ्या . साधनाने आवाज दिला.
२ मिनिटं झाली पण कसलाच प्रतिसाद नाही.

महेशने पुन्हा हाक मारली.

आई... डोळे उघड ना. काहीतरी खाऊन घे मग झोप परत.

साधना घाबरून जवळ आली. वेदही आजीचा हात धरून रडू लागला.

पण सुमनबाईंच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांत, समाधानी स्मित उमटले होते. डोळ्यांच्या कोपऱ्यात अजूनही आनंदाश्रू चमकत होते.

जणू विठ्ठलाचे दर्शन घेताच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.

महेशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो आईच्या चरणी नतमस्तक झाला.

"आई... तुझी वारी कधीच चुकली नाही... आणि यंदाही नाही चुकली. फरक एवढाच... यावेळी तू पंढरपूरहून परत आलीच नाहीस. विठ्ठलाने तुला कायमचं आपल्या चरणी स्थान दिलं."

भक्ताची शेवटची वारी ही पंढरपूरपर्यंत नसते; ती विठ्ठलाच्या चरणांपर्यंत असते. आणि त्या दिवशी सुमनबाईंची वारी पूर्ण झाली होती.

समाप्त.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →