Login

रेशीम गाठींचा गोडवा भाग १

रेशीम गाठींचा गोडवा भाग १
रेशमी गाठींचा गोडवा

भाग १

" अगं मृणाल, गुढीला हार घालताना तो असा वाकडा का झालाय ? आणि रांगोळीत तो पोपटी रंग कशाला भरलायस ? आमच्या घरी ना, गुढीपाडव्याची तयारी पहाटे चार वाजल्यापासून अगदी शिस्तीत व्हायची. इथे तर सगळा आनंदी आनंदच दिसतोय !"

निशिगंधाने हॉलमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या आपल्या टीकेचा बाण सोडला.

मृणालने हातातला फुलांचा हार घट्ट धरला. लग्नानंतरचा तिचा हा तिसरा पाडवा होता, पण दरवर्षी नणंदबाई माहेरी आल्या की, घराच्या वातावरणात आनंदापेक्षा तुलना आणि स्पर्धा जास्त वाढायची.

" अगं निशी, आताची मुलं सुशिक्षित आहेत, त्यांना त्यांच्या आवडीने करू दे ना गं ! "

सासूबाई राधाबाई वरवर मृणालची बाजू घेत म्हणाल्या, पण पुढच्याच क्षणी त्यांनी आपला खरा पत्ता टाकला,

" पण मृणाल, निशी म्हणतेय त्यात तथ्य आहे हं.! तिने आणलेली ती भरजरी पैठणी बघितलीस का ? खास गुढीसाठी घेऊन आलीय ती.
तू आणलेलं ते साधं कापड जरा फिकं वाटेल गं त्यासमोर. आपल्या घराची गुढी गल्लीत सर्वात उठून दिसायला नको का?"

मृणालने एक दीर्घ श्वास घेतला. तिने मोठ्या उत्साहाने एक सुंदर आकाशी रंगाचं रेशमी वस्त्र गुढीसाठी आणलं होतं, पण सासू आणि नणंदेच्या ब्रँडेड आणि महागड्या विचारांसमोर तिच्या आवडीचा गळा घोटला जात होता.

" आई, हरकत नाही. जर निशिगंधाला ती पैठणी लावायची असेल, तर लावूया. सण आनंदाचा आहे, साडीचा नाही." मृणाल शांतपणे म्हणाली. किचनकडे वळली.

पण निशिगंधाला एवढ्यावर समाधान नव्हतं. ती सोफ्यावर बसून आपल्या महागड्या दागिन्यांचं प्रदर्शन करत म्हणाली,

" आई, तुला माहितीये ? यंदा पाडव्याला माझ्या मिस्टरांनी मला हा सोन्याचा तोडा दिलाय. मृणालला काय मिळालं ग ? समीर दादाने काही घेतलं की नाही ? की अजून गृहकर्जाचे हप्तेच चालू आहेत ?"

हा प्रश्न थेट मृणालच्या काळजाला लागला. समीर आणि मृणाल दोघांनी मिळून कष्टाने हे घर घेतलं होतं, पण निशिगंधासाठी तिचं श्रीमंत सासर नेहमीच अभिमानाचा आणि मृणालला कमी लेखण्याचा विषय असायचा.

किचनमध्ये पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता, पण मृणालच्या मनात मत्सराचा धूर साचला होता. तिला जाणवत होतं की, या घरात ती कितीही राबली तरी बाहेरचीच राहणार.

दुसरीकडे, निशिगंधा स्वतःला या घराची मालकीण समजत होती. राधाबाई आपल्या लेकीच्या कौतुकात इतक्या मग्न होत्या की, त्यांना आपल्या सुनेच्या डोळ्यांतील पाणीही दिसत नव्हतं.

दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली. मृणालने अतिशय सुंदर , भरपूर पुरण भरून , मऊ पुरणपोळ्या केल्या होत्या. ताटं वाढली गेली. गुढीची पूजा झाली. पण पूजेच्या वेळीही निशिगंधाने गुढी उभी करण्याच्या पद्धतीवरून मृणालला चार गोष्टी सुनावल्याच.

" मृणाल, तो कडुलिंबाचा पाला असा नाही, असा लावायचा असतो. तुला साध्या परंपरा तरी माहिती आहेत का ग ? " निशिगंधाने उपरोधिकपणे विचारलं.

राधाबाईंनी त्यावर हसून दाद दिली,

" असू दे गं निशी, तिला कोण सांगणार ? आपल्या घरचे संस्कार आणि तिचे संस्कार यात फरक तर असणारच ना!"

संस्कार या शब्दाने मृणालचं डोकं भणाणलं. तिने शांतपणे प्रसादाचं ताट समोर धरलं. कडुलिंबाची पानं, जिरे आणि गुळ यांचा तो प्रसाद खायला दिला. तो कडू प्रसाद चावताना निशिगंधाचा चेहरा वाकडा झाला.

" आई ग, किती कडू आहे हे!" निशिगंधा ओरडली.

मृणाल हळूच म्हणाली,

" नणंदबाई, हा प्रसाद आहे. तो कडवट असला तरी आरोग्यासाठी चांगला असतो. पण मनात जर कडवटपणा असेल, तर गुळही कडूच लागतो, नाही का ? "

हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली. निशिगंधा आणि राधाबाईंनी एकमेकींकडे पाहिलं. मृणालने पहिल्यांदाच तोंड उघडलं होतं. तिची ईर्षा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती.

जेवणाच्या टेबलावर बसल्यावर खरा धमाका झाला. समीर ऑफिसच्या काही कामानिमित्त बाहेर गेला होता, त्यामुळे घरात या तीनच स्त्रिया होत्या. निशिगंधाने पोळीचा एक तुकडा तोंडात टाकला आणि तोंड वेडंवाकडं करत म्हणाली,

" मृणाल, पोळी जरा चामट झालीय गं ! माझ्या सासरी ना, अगदी कापसासारख्या पोळ्या होतात. आई, तू शिकवलं नाहीस का हिला ? "

राधाबाईंनीही लगेच दुजोरा दिला,
" खरंच की निशी ! मृणाल, स्वयंपाक म्हणजे केवळ पोट भरणं नसतं, त्यात सुबकता हवी."

मृणालने आपलं ताट बाजूला सारलं. तिचे डोळे रागाने आणि अपमानाने लाल झाले होते. तिने शांतपणे विचारलं,

" निशिगंधा, तुम्हाला माझ्या पोळ्या चामट वाटतात, माझी रांगोळी खराब वाटते. माझे संस्कार कमी वाटतात. मग मला एक सांगा, या घरातल्या सणाचं तुम्हाला खरंच कौतुक आहे की फक्त मला नीच दाखवण्यात तुम्हाला आनंद मिळतोय ?"
राधाबाई ओरडल्या,

" मृणाल ! हे काय बोलणं झालं ? निशी पाहुणी आहे आपली."

" आई, ती पाहुणी नाही, ती या घरची मुलगी आहे. पण जर मुलीला सासरी गेल्यावर एवढा मान मिळतो, तर सुनेला तिच्या हक्काच्या घरात मान का मिळत नाही ?
आज पाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात. पण जर जुना मत्सर आणि ईर्षाच सोबत ठेवायची असेल, तर या नवीन वर्षाचा उपयोग काय ? "

मृणालच्या या थेट प्रश्नाने निशिगंधाचा चेहरा गोरामोरा झाला. तिला वाटलं नव्हतं की मृणाल असं काही बोलेल. पण ही तर फक्त वादाची सुरुवात होती. खरा प्रसंग तर संध्याकाळी घडणार होता, जेव्हा घराची गुढी एका मोठ्या संकटात सापडणार होती.