Login

पाणी कुठेतरी मुरतंय ३

Sasu Sun
त्यावर त्या हसल्या. “ खूप दिवसापासून हेच सुरू होते ना तुझ्या डोक्यात.. मागे एकदा फोनवर बोलतांना ऐकलेले मी, माझ्या बद्दल बोलत होतीस..”

तिने जीभ चावली.

सरस्वतीबाई काही क्षण शांत राहिल्या.
मग हळूच म्हणाल्या, “राग येतो गं… खूप येतो.”

मीनल आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली.
“मग… तुम्ही दाखवत का नाही?”

सरस्वतीबाईंच्या डोळ्यांत हलकी ओल आली.
“कारण मला माझ्या आयुष्याचा एक खूप कडवट अनुभव आहे…”
मीनल सुद्धा अगदी लक्ष देऊन ऐकू लागली.


“जेव्हा मी या घरात सून म्हणून आले, तेव्हा माझी सासू खूप कडक स्वभावाची होती. घरातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या नियमांनुसारच व्हायला हवी, बोलण्याची पद्धत, काम करण्याची वेळ, अगदी हसण्यालाही मर्यादा. लहानसहान चुका झाल्या की राग, टोमणे, उपरोध… सगळं सहन करत होते मी.”

कितीतरी वेळा एकटीच रडायचे. मनात सतत एकच प्रश्न यायचा — ‘मी एवढी वाईट आहे का?’ पण त्या काळात सून म्हणून बोलून दाखवणं म्हणजे अवज्ञा समजली जायची. त्यामुळे मनातलं मनातच ठेवायचं.”

त्या क्षणभर थांबल्या. डोळ्यांत जुन्या आठवणींची ओल चमकली.

“फार तर नवऱ्याला जाऊन सांगायचे. पण घरातील पुरुषांनी कधीच त्यांच्या आईला काही विचारलं नाही. उलट आम्हालाच समजून घ्यायला सांगायचे , ‘आईचा स्वभाव तसाच आहे, तू शांत राहा.’ मग आम्हीच गप्प बसायला शिकलो.

“ घरातला छोटा , माझा दीर विवेक, आमच्या सगळ्यांचा लाडका होता. माझं लग्न झालं तेव्हा तो दहावीत शिकत होता. त्यामुळे तो कधी दीर वाटलाच नाही, अगदी लहान भाऊ, कधी मुलासारखा. त्याच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही सगळे सहभागी असायचो.
नंतर त्याचं लग्न झालं. त्याची बायको नोकरी करणारी, शिकलेली, नवीन विचारांची मुलगी होती. वयानेही आमच्यापेक्षा लहान, तुम्ही म्हणता तशी जनरेशन गॅप. नोकरीमुळे तिच्याकडून घरातील सगळं सासूबाईंच्या अपेक्षेनुसार होत नव्हतं. सासूबाई काही बोलल्या की ती उत्तर द्यायची.
खरं सांगायचं तर आम्हालाही सासूबाईंचं बोलणं आवडत नव्हतं… पण आम्ही गप्प राहण्याची सवय लावून घेतली होती. म्हणून तिचं उत्तर देणं आम्हाला धाडस वाटायचं, पण भीतीही वाटायची, ‘ही एवढं का मनाला लावून घेतेय?’
हळूहळू घरात ताण वाढत गेला. ती वेगळं राहायचं म्हणू लागली. विवेक तयार नव्हता. दोघांमध्ये वाद वाढत गेले.
एक दिवस नवरा-बायकोचं भांडण इतकं विकोपाला गेलं की ती रागाच्या भरात छतावर धावत गेली. तो तिच्या मागे गेला तिला थांबवायला. काय झालं म्हणून आम्ही सगळे मागे धावलो…
पण नियतीने एका क्षणात सगळं बदलून टाकलं.
तो तिच्या मागे धावत असताना त्याचा पाय अडकला… आणि तो खाली पडला. क्षणभरात सगळं संपलं.
आमचा विवेक गेला… आणि आमचं घरही जणू श्वास घ्यायचं विसरलं.
सासूबाई एकदम शांत झाल्या. आयुष्यभर कडक राहिलेल्या त्या स्त्रीच्या डोळ्यांत फक्त पश्चाताप उरला होता. ‘माझ्यामुळेच झालं… माझ्यामुळेच झालं…’ असं म्हणत त्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःलाच दोष देत राहिल्या.
मी नंतर खूप प्रयत्न केला घर पुन्हा उभं करण्याचा , नात्यांची घडी बसवण्याचा. पण काही रिकाम्या जागा कधीच भरत नाहीत.

सगळं संपल्यावर पश्चाताप करून काय मिळतं?
अक्कल, समज, माया, हे सगळं कुणीतरी कायमचं निघून गेल्यावरच का येतं?
आपण मुलाचे लग्न का करतो? घरात सून का आणतो?
घर वाढवण्यासाठी… की अहंकार वाढवण्यासाठी?
आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय असतं?
जिंकलेली वादविवाद… की टिकलेली माणसं?
घराचं सुख कशात असतं? एकमेकांना बदलण्यात नाही… तर एकमेकांना समजून घेण्यात.राग येतो… मतभेद होतात… पण त्या क्षणाच्या रागाची किंमत कुणाच्या आयुष्याइतकी मोठी नसते.
कारण शेवटी लक्षात राहतं ते एकच, सुखाची किंमत कुणाच्या जीवाइतकी कधीच नसते.”

मीनल शांतपणे ऐकत होती.
त्या शब्दांमध्ये फक्त एक कथा नव्हती…
तर अनेक घरांना वेळेआधी समज यावी अशी एक वेदनादायक शिकवण होती.

मीनल च्या डोळ्यांत पाणी आलं.
“आई… मला वाटत होतं काहीतरी गुपित आहे.”
सरस्वतीबाई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या —
“गुपित आहेच गं… पण ते वाईट नाही.
ते फक्त एक ठरवलेलं प्रेम आहे.”


घराच्या आतून मुग्धा आणि रश्मीचा हसण्याचा आवाज आला. स्वयंपाकघरातून फोडणीचा सुगंध दरवळत होता. कुठेतरी रेडिओवर जुनं गाणं लागलं होतं..
जीवन नेहमीसारखंच पुढे चाललं होतं…
पण त्या क्षणी मीनलच्या मनात काहीतरी कायमचं बदललं होतं.

पाणी कुठेही मुरत नव्हतं…
तिथे फक्त एका स्त्रीने आपल्या भूतकाळाच्या वेदनांना प्रेमात बदललं होतं.

आणि त्या घरात खरंच एक आदर्श नातं फुलत होतं,
सासू आणि सुनेचं.

0

🎭 Series Post

View all