Login

नणंदेचा संसार भाग 1

गोष्ट वाट चुकलेल्या नणंदेची
विदुलाच्या नणंदेचं मागच्या वर्षी लग्न झालं होतं. पण काही कारणाने ते मोडलं. आता प्राची माहेरीच राहत होती. आधीच अबोल असलेली प्राची जास्तच गंभीर झाली होती.
नाही म्हटलं तरी विदुलाला टेन्शन आलं होतं. गडबडीत लग्न होतं काय, नवरा - बायकोचं नातं फुलून येण्याआधी ते मोडतं काय! बरं, याला जबाबदार नक्की कोण होतं, हे कोणालाच समजत नव्हतं. नेमकं काय घडलं? हे प्राची सांगत नव्हती.

माहेरी दिमतीला वहिनी असल्याने असताना प्राचीला कामाची मुळीच सवय नव्हती. लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी तिची काही तक्रारही केली नव्हती. मग पाणी कुठे मुरत होतं, देवच जाणे. त्यातून हे घर चार खोल्यांचं. जागा अपुरी.
दादा ऑफिसला गेला की प्राची त्याच्या रूममध्ये जाऊन बसायची ती संध्याकाळी बाहेर पडायची. विदुलाला आपल्या खोलीत मनमोकळेपणाने उभंही राहता यायचं नाही. दुपारी पडायचं म्हंटल तरी प्राची तिला आत येऊ द्यायची नाही. ती आपल्याच विश्वात मग्न असायची.

"वहिनी, मला एकटीला राहू दे. तू सारखी आत -बाहेर करू नकोस." एक दिवस प्राची म्हणाली.

हे ऐकून विदुला सासुबाईंकडे गेली. "आई, या घरात मला माझी हक्काची जागा मिळणार आहे की नाही? प्राची तुमच्या खोलीत वावरली तर काय हरकत आहे?"

"थोडे दिवस समजून घे. आत्ता तिची अवस्था नाजूक आहे. वेळ गेला की सगळं ठीक होईल. तोवर तू अडजेस्ट कर. सुनांनी जरा कमीपणा घेतला म्हणून काही बिघडत नाही. काहीही झालं तरी या घरची लाडकी लेक आहे ती." सासुबाई.

"आई, तुमचा तिच्यावर काही अधिकार नाहीय का? तिला काय झालंय बघा. बोला तिच्याशी. लेक पुन्हा माहेरी का आली, हे विचारा. नाहीतर हक्काने जाब तरी विचारा. अशी किती दिवस कुढत बसणार ती?" विदुला रागाने म्हणाली.
"नवऱ्याचा, सासरच्या लोकांचा स्वभाव असा एका वर्षात कळून येतो? की आणखी काही कारण आहे? त्यांनी वेगळं व्हायचं म्हटलं आणि तुम्ही कारण न विचारता तिला घरी आणलंत!" इतक्या दिवसांचा विदुलाचा साठलेला राग बाहेर पडला.
आपण बोललो तर विषयाला वेगळं वळण लागेल हे तिला माहिती होतं. काहीही झालं तरी आज नवऱ्याशी बोलायचंच, असं ठरवून ती कामाला लागली.

संध्याकाळी अचानक प्राचीचा नवरा, विहंग घरी आला. तसा प्राचीचा दादा, वैभव त्याच्या अंगावर धावून गेला. " माझ्या बहिणीचा संसार मोडायला लाज कशी वाटली नाही? सोन्यासारखी बायको आहे, स्वभावाने शांत आहे. जास्त बोलत नाही. मग उलट उत्तर तरी कशी देईल ती? नक्की काय झालंय?"

"दादा, हे घटस्फोटाचे पेपर्स." विहंग शांतपणे म्हणाला. हे ऐकून प्राचीच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलली नाही. तिने आपल्या नवऱ्याकडे बघायचे कष्टही घेतले नाहीत.

"विहंग, नेमकं काय घडलंय ते कळेल का?" आता मात्र विदुला चिडली.

"वहिनी, हिला कामाची सवय नाही. ही नवी सून म्हणून आईने वर्षभर घरातलं सगळं केलं. पण प्राची नुसती जेवणाच्या ताटावर बसायची आणि जेवण झाल्यावर हात धुवून पुन्हा आपल्या खोलीत निघून जायची. सून म्हणून माणूस थोडी तरी अपेक्षा ठेवतोच ना, पण ही एकाही कामाला हात लावायची नाही. अगदी केर -वारे सुद्धा कधी काढले नाहीत.
एखादा दिवस पाहुणे आले तरी त्यांच्याशी बोलायचं राहू दे. आपल्या खोलीतून ती बाहेर सुद्धा यायची नाही. मग त्यांची सरबराई करायची राहिली बाजूला.

प्राची शांत असली तरी आम्हाला वाटलं स्वभावाने लाघवी असेल. पण ही इतकी घुमी की सासू म्हणून आईशी दोन शब्दही बोलायची नाही. मग आमच्या बाबांशी कशी काय बोलणार? आईने नवलाई म्हणून हिच्यासाठी बरेच कार्यक्रम केले. पण त्यात हिचा सहभाग अगदी शून्य. शेजारी -पाजारी नवी सून म्हणून विचारपूस करायला आले तरी यांचा प्रतिसाद थंडच. तरीही आम्ही तक्रार कधी केली नाही आणि नवरा म्हणून मला हिच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

एक दिवस मात्र आईचा संयम संपला. आई म्हणाली, "आपण दोघी कामं वाटून घेऊ म्हणजे कोणा एकावर भार पडणार नाही."
"आमच्या घरी वहिनीचं सगळं करायची. मला कामाची सवय नाही." प्राची इतकंच म्हणाली.

"आपल्याला गडबड नाही. मी शिकवेन सगळं." असं म्हणत आईने तीही तयारी दाखवली. "पण सगळ्याच बाबतीत निरुत्साह असेल तर आम्ही तरी काय करणार? एक दिवस मी चिडून म्हणालो, असं असेल तर तुझ्या माहेरी निघून जा आणि ती खरंच निघून आली. ना कसली मागणी, हट्ट, ना उत्साह, चेहऱ्यावर प्रसन्नता नाही की हसू नाही. हा कसला संसार म्हणायचा?" विहंग चिडून म्हणाला.

आता मात्र विदुलाच्या सासुबाईंची मान खाली गेली. वैभव रागाने आपल्या बहिणीकडे बघायला लागला. "प्राची, काय हे? इतकी चांगली माणसं असूनही तुला संसार का करायचा नाहीय?"

"वैभव, यात तिची काही चूक नाहीय. खरी चूक माझी आहे." विदुलाच्या सासुबाई हळूवार आवाजात म्हणाल्या. "शेंडेफळ म्हणून हिचे नको तितके लाड केले. न मागता सगळ्या गोष्टी पुढ्यात आणून दिल्या. आयातं मिळतंय म्हणताना तिला याची सवय होत गेली.
लहानपणापासून खूप जपलं प्राचीला. नको तितकी काळजी केली. लेक कधी ना कधी सासरी जाणार हे नक्की. तिथं गेल्यावर कामं करावीच लागतात म्हणून मी सारा कारभार विदुलाकडे सोपवून रिकामी झाले. सून करते म्हंटल्यावर आम्हा दोघींना काही करावं लागत नव्हतं."

"पण एक दिवस तीही कोणाची तरी सून, बायको होणार हे
कधी तुमच्या लक्षात आलं नाही?" विहंग मध्येच म्हणाला.
आपली नणंद काही काम करत नाही ही बाब विदुलाला खटकत असली तरी प्राचीचा कसलाही त्रास नव्हता. त्यामुळे सवय होत गेली, तशी विदुला रुळत गेली.


क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →