नणंदबाईंची मुलं घरी आल्यावर सगळं कसं त्यांच्या हक्काचंच होऊन जायचं. राधा आणि नीता, दोन्ही नणंद भावजय..दोघींच्या मुली सारख्याच वयाच्या, दोघी सहावीत शिकणाऱ्या. सुट्टी लागली की नीता आपल्या मुलीला माहेरी घेऊन येई. वहिनीच्या मुलीसोबत तिची चांगली गट्टी जमायची.. दोघी मामे-आतेबहिणी एकत्र गप्पा मारत, खेळत, फिरायला जात. त्यांना बघून राधालाही बरं वाटायचं, पण त्या दिवशी संध्याकाळी असा प्रसंग घडला की राधाला परिस्थितीची गांभीर्य कळलं..
सासूबाईंनी सुनेला- राधाला आवाज दिला,
"राधा..मी जत्रेत गेलेली तेव्हा एका पिशवीत वस्तू आणलेल्या बघ, ती पिशवी आण बघू.."
हे ऐकताच राधाची मुलगी कावरीबावरी झाली, तिच्या मनात वेगळीच चलबिचल सुरू झाली. राधाच्या नजरेतून ते सुटलं नाही. तिने हळूच तिला जाऊन विचारलं,
"काय झालं बेटा?"
"आजीने जत्रेतून एक मोत्यांचा हार आणलाय बघ"
"तुझ्यासाठी आणलाय ना तो, त्याचं काय?"
"आता तो स्वराला मिळणार.."
मुलीच्या मनातली सल राधाला कळली आणि ती म्हणाली,
"नाही गं, आजीने तुला आणलाय ना तो हार.."
बोलता बोलता आजीने तो हार बाहेर काढला आणि स्वराने पटकन हार उचलला,
"किती छान आहे.."
असं म्हणत तिने तो घातलाही, आजीनेही छान म्हणत तो तिला दिला..
राधाला वाईट वाटलं, नणंद म्हणून मान देणं माझ्यापर्यंत ठीक होतं पण माझ्या मुलीच्या बाबतीत भेदभाव का?
"जाऊदे, मी तुला याहून मस्त हार घेऊन देईन" असं सांगून राधाने तिची समजूत घातली. आजीही म्हणाली,
"अगं स्वरा आपल्याकडे पाहुनी आलीये ना, देऊन टाक तिला.."
गोष्ट साधी होती पण पुढे वाढतच गेली, घरात प्रत्येक गोष्ट स्वराला जशी आवडेल तशी होत असे. राधाच्या मुलीला कायम दुय्यम वागणूक मिळे. प्रत्येक गोष्ट स्वराच्या मालकीची हे ठरलेलं असायचं, बिचाऱ्या राधाच्या मुलीवरही हेच बिंबवलं गेलं.
"आई, आत्याची मुलगी झाल्यावर किती मजा असते ना? तूही आत्या आहेस, मग आजीकडे मलाही सगळं मिळत जाईल का?"
तिच्या या प्रश्नावर राधाला मात्र रडू आलं. सासूबाईंनी किमान मुलांच्या बाबतीत तरी अशी भूमिका घेऊ नये असं राधाला कायम वाटायचं.
एकदा सोसायटीत चित्रकलेची स्पर्धा होती. स्वरा आणि मीना दोघी बहिणींनी भाग घ्यायचं ठरवलं. स्वराने रंगपेटी आणली नव्हती, मीनाकडे एकच रंगपेटी होती. आजीने लगेच सूर लावला,
पुढे असं काही घडलं की राधा ठामपणे मुलीच्या बाजूने उभी राहिली..वाचा पुढील भाग...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
