Login

डाव स्वराज्याचा-भाग 2

जलदकथा
जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026

विषय: खेळ नशिबाचा


डाव स्वराज्याचा - भाग 2

( मागील भागात---

सुर्याजीने कांजीचा वाडगा हाती धरताच आबाजीचे डोळे लकाकले.
आज आपले नशीब उघडले असा विचार आबाजीच्या मनात आला.
पण त्यांना कल्पना नव्हती.

नशिबाचा खरा खेळ तर पुढे सुरू होणार होता. )

आता पुढे--

पावसाचा आवाज झोपडीच्या छतावर दगडासारखा आदळत होता.

झोपडीत मशालीचा थरथरणारा प्रकाश आबाजींच्या चेहऱ्यावरचे हावभाव अधिकच क्रूर दाखवत होता.

आबाजीने दिलेली कांजी सूर्याजीनेते पिली.

त्याला गुंगी चढू लागली होती, पण त्याचे कान तीक्ष्ण होते.

आबाजी: (हळूच सूर्याजीच्या कंबरेला हात लावत) "काय कमावलंस रे पोरा या स्वराज्यासाठी? शरीरावर जखमा आणि पदरात गरिबी? हा खलिता तुझं नशीब आहे असं तुला वाटतं, पण आता तुझं हे नशीब माझं झालं."

आबाजी खलिता काढू लागला.

सूर्याजी: (डोळे न उघडता, जड आवाजात) "बाबा... हात मागे घ्या. जे तुमचं नाही, त्याला स्पर्श करणं म्हणजे काळसर्पाला मिठी मारण्यासारखं आहे."

सूर्याजीने हळूच डोळे उघडले.

त्याच्या डोळ्यांत मरणाची भीती नव्हती, तर एक प्रकारचे धैर्य होते.

आबाजी दचकले. त्यांनी हात मागे घेतला.

आबाजी: "काळसर्प? अरे, मी आयुष्यभर सर्पांशीच खेळलोय. शिवाजीनं मला हद्दपार केलं, माझं ऐश्वर्य हिरावलं.
तिरस्कार करतो मी त्याचा. मी कोण माहितयं का तुला?"

आबाजी तिरस्काराने बोलत होता. शिवरायांना एकेरी संबोधत होता.
सूर्याजीचा पारा तेव्हांच चढला होता पण जखमा आणि येत असलेली गुंगी यामुळे तो असहाय्य होता.

"मी विजापूरच्या सुलतानाचा खबरी होतो. तुझ्या शिवाजीची प्रत्येक हालचाल सुलतानाला कळवायचो आणि सोन्याच्या मोहरा मिळवत होतो, खूप श्रीमंत व्हायचे होते मला, तुया राजापेक्षा बी श्रीमंत...."

"पण तुह्यासारख्या चमच्याईनी माहा घात केला अन शिवाजीनं मले पकडून, चोप देऊन स्वराज्यातून बेदखल केलं.
मंग मी आता काही कामाचा राह्यलो नाय म्हणून सुलतानानं बी हाकलून लावलं. तवापासून इथं गरिबीत दिस काढून राह्यलो,"

आबाजी रागात बोलत होता, महाराजांबद्दल अपमानास्पद उद्गार काढत होता.

सूर्याजीचे रक्त सळसळू लागले होते.

"आज नशिबानं तुले माया दारात आणले. हा खलिता मी
सिद्दी मसूदला देणार... म्हायं मेलेलं नशीब पुन्हा जितं व्हनार," क्रूर हसत आबाजी बोलत होता.

सूर्याजी: (कष्टानं हसत) "नशीब? , नशीब हे एखाद्या सावलीसारखं असते आबाजी.
प्रकाश समोरून आला की ती मागे पडते आणि प्रकाश मागून आला की ती पुढे धावते.
तुमी ज्याला तुमचं ' नशीब' समजताय, ते तसं न्हायी...."

"उपकार माना राजंचं, तुमाले जीतं सोडलं...म्या असतो तर मुडदा पाडला असता," सूर्याजी त्वेषाने बोलत होता.

आबाजी: "एय पोरा, जास्त बोलाचं काम न्हाय," आबाजीचे डोळे आग ओकत होते.

" अन कायचे उपकार? तू मरणाच्या दारात उभा हाय अन मजाक सुचतेय व्हय? माया मुडदा पाडायच्या बाता करतो व्हय....
म्या निघालो हा खलिता घेऊन...तू इथेच सडत पड.
जवा तुले खबर लागल की ह्यो आबाजी सिद्दी मुसादचा 'खास खबरा' झालाय, तवा सांगजो बाबू मुडदा पाडायच्या गोष्टी....इथवर आल्याचा पश्चाताप होईल तुलं गड्या..,"खदखदा हसत आबाजी बोलला.

आबाजीच्या डोक्यावर सोन्याच्या मोहरा मिळवण्याचे भूत सवार होते.

आबाजींनी रागाच्या भरात खलिता हिसकावून घेतला.

सूर्याजी गुंगीत गेला हे बघून त्याचे हात पाय बांधले आणि अंधारात बाहेर पडले.

सिद्दी मसूद ने विशाळगडाला विळखा घालण्यास सुरुवात केली होती तेव्हा त्याच्याविरुद्धचा काहीतरी डाव शिवरायांनी आखला असेल अन खलिता गडावर पोचवायचा असेल हे ओळखून लालची आबाजी मसूदकडे निघाला, खलिता घेऊन, नशीब आजमवायला.

सूर्याजी मात्र अर्धवट शुद्धीत होता.

मंद हसत तो स्वतःशीच बोलू लागला.

सूर्याजी: "पश्चात्ताप मला नाही, सह्याद्रीच्या वाऱ्याला होईल... की त्याने एका लोभी माणसाला इतकी वर्षं स्वतःच्या कुशीत आसरा दिला.
आबाजी लक्षात ठेवा, नशिबाच्या खेळात तुम्ही प्यादं आहात की वजीर, हे शेवटच्या चालीवरच कळतं...."

आबाजींना वाटलं त्यांनी सूर्याजीला हरवलंय, पण सूर्याजीच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान होतं.


क्रमशः

© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती


(टीप: सदरहू कथा संपूर्णतः काल्पनिक असून अश्या प्रकारची घटना इतिहासात घडली असल्याचा दावा लेखिका करीत नाही.)
0

🎭 Series Post

View all