Login

आठवणीतला उन्हाळा..

आठवणीतला उन्हाळा मनाला गारवा पसरवत राहतो..

आठवणीतला उन्हाळा


खरंच ना…
आठवणीतला उन्हाळा आता फक्त आठवणीतच उरलाय.


कुठे हरवली ती दोन महिन्यांची सुट्टी,

कुठे हरवली मामाच्या गावाला घेऊन जाणारी ती झुकझुक गाडी… आणि कुठे हरवले ते दिवस, ज्यांची आपण वर्षभर वाट पाहायचो…


उन्हाळा म्हणजे फक्त ऋतू नव्हता,
तो आनंदाचा सण होता.



जसं जसं मोठं होत गेलो, तसं सगळंच बदलत गेलं.
कालपर्यंत सुट्टी लागली की आधी बॅगा भरल्या जायच्या,
मग सुरू व्हायची गावाला जाण्याची ओढ… खिडकीत बसून बाहेर बघत केलेला प्रवास, आणि मन मात्र आधीच मामाच्या गावात पोहोचलेलं असायचं.


आता एकटं कुठेही जाण्याइतकं मोठं झालो, पण वेळ मात्र हातातून निसटून गेला.


जसं जसं मोठं होत गेलो ना, तसं उन्हाळा बदलत गेला.
पूर्वी वेळ कमी आणि आनंद जास्त होता.
आता वेळच उरला नाही.



उन्हाळा आणि आंब्याचं नातं किती घट्ट होतं ना…
घरभर दरवळणारा आंब्याचा सुगंध म्हणजे उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल असायची. आता मात्र उन्हाळा संपत येतो आणि मग कुठेतरी आंबे घरात दिसतात…


“दुपारच्या उन्हात खेळू नका…” म्हणत मोठ्यांकडून मिळणारा ओरडा आठवतो ना?

आता त्याच जागी —
“पाणी जास्त पि… अभ्यास कर… बाहेर जाऊ नको…” अशा सूचना मोबाईलच्या स्क्रीनवरून येतात.
माणसं तिच राहिली, फक्त माध्यम बदललं..


गावची यात्रा आली की लांबचे-जवळचे सगळे नातेवाईक एकत्र यायचे… अंगणात चटई टाकून मोकळ्या आकाशाखाली झोपणं, रात्री उशिरापर्यंत चालणारी अंताक्षरी, भुतांच्या गोष्टी ऐकताना वाटणारी भीती… सगळंच किती जिवंत होतं ना!


मामाची मुलं, मावशीची मुलं, आत्याची मुलं...सगळे मिळून झाडाच्या सावलीखाली रंगलेले खेळ, काचाकवड्यांचे डाव, लपाछपी, लगोरी याची मज्जा काही वेगळीच होती..
ती मजा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये कधीच सापडली नाही.


थंडगार माठातलं पाणी गळ्याखाली उतरलं की एक वेगळंच समाधान मिळायचं… संध्याकाळी विहिरीत मारलेली ती उडी, पाण्यातले ते बेधुंद क्षण, आणि सगळ्यांसोबत मनसोक्त हसणं…

खरंच, हरवलं ते सुख…


आणि त्या उन्हाळ्यातली आईस्क्रीमची मज्जा तर काही
औरच होती ना… आजसारखे कुठे होते इतके फ्लेवर्स, फॅन्सी कप आणि मोठमोठे ब्रँड्स…


गावात दूर कुठेतरी घंटीचा आवाज ऐकू आला की,

“आईस्क्रीमवाला आला…!” म्हणत सगळी पोरं धावत बाहेर पडायची.

हातात दोन रुपये घट्ट पकडून घेतलेला तो छोटासा कोन,
किंवा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा आणि त्यामुळे रंगलेली जीभ दाखवत फिरायची आवड वेगळी होती.


त्याची चव अजूनही जिभेवर तशीच रेंगाळतेय.
अर्धं आईस्क्रीम वितळायच्या आत संपवायची घाई,
आणि दुसऱ्याच्या हातातला फ्लेवर जास्त मोठा वाटायचा…
त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच किती मोठा आनंद दडलेला होता ना…


आता मोठमोठे पार्लर्स आहेत, शेकडो फ्लेवर्स आहेत…
पण त्या घंटीच्या आवाजातला आनंद
आणि त्या दोन रुपयांच्या आईस्क्रीममधलं सुख
पुन्हा कधीच मिळालं नाही…


आता उन्हाळा येतो… पण तो फक्त तापमान घेऊन येतो.
घामाच्या धारांनी भरलेलं शरीर बघितलं की जाणवतं,
आताच्या उन्हाळ्यात उकाडा जास्त आहे…
पण आठवणीतल्या उन्हाळ्यात माणुसकीचा गारवा होता.


त्या उन्हातही मन निवांत होतं, चेहऱ्यावर थकवा नव्हता…
आणि छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणारं बालपण होतं.


आता एसी आहेत, कूलर आहेत, पण तरीही मनाला तो गारवा भेटत नाही… कारण आठवणींचा थंडावा माणसांसोबत हरवून गेला…


आठवणींचा उन्हाळा असा होता ना…
की तपत्या उन्हातही मनात गारवा पसरवत होता… ✨



क्रमशः

खरचं तो उन्हाळा हरवला आहे , तुमच्या काही वेगळ्या आठवणी असतील तर नक्की सांगा ..
अशाच नवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका...





0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →