Login

लग्नगाठी, खरंच स्वर्गातच बांधल्या जातात का ?

लग्नगाठी, खरंच स्वर्गातच बांधल्या जातात का ?

लग्नगाठी, खरंच स्वर्गातच बांधल्या जातात का ?
लेखक: सुनिल पुणेTM 9359850065.

"लग्नगाठी (पूर्वकर्मांनुसार) स्वर्गात, ईश्वराच्या इच्छेनेच बांधल्या जातात," या विचारावर माझा आजही पूर्ण विश्वास आहे. कोणी मानो अथवा न मानो, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण आयुष्यात असंख्य घटना पाहिल्यानंतर, अनेक संसार जवळून अनुभवले आणि नात्यांचे चढउतार समजून घेतले, तेव्हा हा विश्वास अधिक दृढ झाला.
आपण कितीही प्रयत्न करतो. मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळं पाहतो. शेकडो फोटो पाहिले जातात, अनेक भेटी होतात, चर्चा होतात, पत्रिका जुळतात, अपेक्षा तपासल्या जातात. "हीच योग्य जोडीदार असेल" असे वाटून निर्णय घेतला जातो. पण शेवटी जुळते तीच जोडी, जी नियतीने आधीच ठरवून ठेवलेली असते.
कधी एखादे उत्तम स्थळ अगदी शेवटच्या क्षणी मोडते आणि मनाला खूप वेदना होतात. त्या वेळी वाटते, "हे माझ्याच बाबतीत का?" पण काही काळानंतर जेव्हा अधिक योग्य व्यक्ती आयुष्यात येते, तेव्हा लक्षात येते की त्या वेळी झालेला नकार हा ईश्वराचा नकार नव्हता; तो पुढच्या चांगल्या आनंदाची तयारी होती.

आपण अनेकदा म्हणतो, "आम्ही शोधून शोधून इतकी छान, सुसंस्कृत, समंजस आणि योग्य मुलगी पसंत केली." पण खरं सांगायचं तर ती आपण शोधलेली नसते; ती आपल्या नशिबात आधीपासूनच लिहिलेली असते. आपण फक्त त्या नियतीने आखलेल्या वाटेवर चालत असतो.

पूर्वजन्मीची कर्मे, आपल्या कृती, संस्कार आणि ईश्वराची इच्छा यांचे एक अदृश्य गणित असते. ते गणित आपल्या बुद्धीला कदाचित समजत नाही, पण काळ मात्र त्याचे उत्तर नक्की देतो.
याचा अर्थ असा नाही की लग्न झाले म्हणजे पुढे काहीच प्रयत्न करायचे नाहीत. संसार सुखाचा होण्यासाठी प्रेम, विश्वास, संयम, त्याग, संवाद आणि परस्पर आदर या गोष्टी रोज जपाव्या लागतात. स्वर्गात गाठ बांधली गेली असेल, पण ती पृथ्वीवर टिकवण्याची जबाबदारी मात्र नवरा बायकोचीच असते.

आजच्या डिजिटल युगात नाती अनेकदा मोबाईलच्या स्क्रीनवर जुळतात आणि त्याच स्क्रीनवर तुटतात. अपेक्षा वाढल्या आहेत, संयम कमी झाला आहे. "माझं" हे मोठं झालं, "आपलं" हे लहान झालं. म्हणूनच नियतीने दिलेल्या जोडीदाराची किंमत समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

माझा विश्वास एवढाच आहे, ईश्वर कधीच चुकीची जोडी लावत नाही. कधी तो आपल्याला योग्य व्यक्ती देतो, तर कधी योग्य धडा शिकवणारी व्यक्ती देतो. दोन्ही आपल्या आयुष्याला घडवण्यासाठीच असतात.
म्हणूनच प्रत्येकाने आपल्या जोडीदाराकडे "नशिबाने मिळालेली अमूल्य भेट" म्हणून पाहावे. तक्रारींपेक्षा कृतज्ञता, अहंकारापेक्षा समजूतदारपणा आणि संशयापेक्षा विश्वास वाढवला, तर प्रत्येक घरात स्वर्गाचा अनुभव येऊ शकतो.

लग्नगाठ स्वर्गात बांधली जाते की नाही, याचा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यावा. पण माझा मात्र आजही ठाम विश्वास आहे, जिचा किंवा ज्याचा हात आपल्या हातात यायचा असतो, तो कितीही वळणे आली तरी शेवटी आपल्या हातात येतोच. कारण काही नाती आपण ठरवत नाही… ती नियती आणि परमेश्वर आधीच ठरवून ठेवतात.

लेखन : सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com

( हा लेख माझ्या नावासकट फॉरवर्ड करण्यास कायदेशीर परवानगी आहे)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →