Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ४०

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग ४०

©® सौ.हेमा पाटील.


मागील भागात आपण पाहिले,निकीता ने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे दिली.तिला जेवढी माहिती होती तेवढी सगळी सांगितली होती.आता पुढे...
 
  जानकीला सोबत घेऊन राहुल आपल्या घरातून बाहेर पडला. त्याला लवकरात लवकर  या ठिकाणापासून दूर जायचे होते. आपण आता सुरक्षित नाही याची त्याला खात्री होती. परंतु शक्य झाल्यास मसुरी सोडून मुंबईला परतायचे असे त्याच्या डोक्यात होते, पण पोलिसांनी आता सगळीकडे नाकाबंदी केली असणार! आपण जर एअरपोर्टवर अगर रेल्वे स्टेशनवर गेलो तर आयतेच त्यांच्या तावडीत सापडणार याबद्दल त्याला अजिबात शंका नव्हती. त्यामुळे त्याने तो विचार दूर सारला.त्याने रेंटवर गाडी मागवली. घरी गाडी बोलवण्यापेक्षा त्याने तिथे जाऊन गाडी घेतली. आपली गाडी त्याने तिथेच एका हाॅटेलच्या बाहेर लावली. जानकीला गाडीत बसवून तो तिथून निघाला.

जात असताना  त्याने उत्तराखंडचा मॅप उघडला आणि मॅप मध्ये पाहून त्याने चंबा हे ठिकाण सिलेक्ट केले. चंबा तेथून जवळपास 50 किलोमीटर दूर होते. त्यामुळे त्याने तिकडे जायचे ठरवले.

‌ त्याने मोबाईल मधील कार्ड बदलले होते, त्यामुळे आपले लोकेशन ट्रॅक केले जाईल याची त्याला भीती नव्हती. तरीही पोलिसांपासून दूरच राहिले पाहिजे हे त्याला माहीत होते.त्याने मोबाईल स्वीच ऑफ करुन ठेवला.निकिता शांत बसणार नाही आणि पोलीस तिला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतील हे त्याला माहीत होते.

   या वेळेला आपल्या नशिबाने साथ दिली नाही. आजपर्यंत सात मुली आल्या पण सगळे काही व्यवस्थित झाले होते . आता मात्र पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागणार हे निश्चित! त्यांच्यापासून सुटका करून घेणे हेच आता पहिले काम आहे. त्यानंतर निकिताकडे बघायचे ठरवू. मात्र निकिताला मी अजिबात सोडणार नाही. माझा पराजय करून येथून निघून गेली. याचा त्याला खूप राग आला होता. पण राग येऊनही काय करणार ? त्याच्या हाती सध्या तरी काहीच नव्हते.

गाडी चालवत असताना मन स्थिर राहावे यासाठी त्याने रेडियोवर गाणी लावली. गाणी ऐकत तो ड्रायव्हिंग करत होता .जानकी मावशी शांतपणे बसली होती पण तिलाही खूप राग आला होता. ती वारंवार राहुलला एकच प्रश्न विचारत होती,
" माझे मालक कुठे आहेत? माझे मालक कुठे आहेत? ते ठीक आहेत ना?" या प्रश्नाचे उत्तर राहुललाही माहीत नव्हते. तर तो काय उत्तर देणार? त्याने मावशीला सांगितले,
"तुम्ही शांत बसा. सगळे काही व्यवस्थित होईल. काळजी करू नका. सखाराम व्यवस्थित असेल. फक्त तो आता आपल्यापासून दूर आहे ." हे ऐकून जानकी थोडा वेळ गप्प बसली. त्यानंतर ती म्हणाली,
" मालक मला खूप भूक लागली आहे." हे ऐकल्यावर राहुल रागावला. "वेळ काय आहे आणि तुम्हाला भुकेचे सुचतेय? इथे जीव वाचवणे जास्त गरजेचे आहे. शांत बसा. काहीही मिळणार नाही. इथून जेवढ्या लवकर दूर जाऊ तेवढे आपल्या हिताचे आहे. का बसायचे आहे तुरुंगात खडी फोडत?" हे ऐकल्यावर जानकी गप्प बसली . तिला खूप राग आला होता. हे सगळे निकिता मुळे घडले म्हणून तिने तिच्या नावाने कडाकडा बोटे मोडली. "तुझं वाटोळं होऊ दे!" अशी ती म्हणाली. ते ऐकून राहुलने तिच्याकडे वळून बघितले.
यावर जानकी म्हणाली,
" त्या बयाला शाप देतेय." राहुल म्हणाला,
" तुझ्या शापाने तिला काय होणार आहे? तिने आपल्या सगळ्यांना पाणी पाजलेय." हे ऐकून मावशी गप्प बसली .

राहुल गाडी चालवत होता पंचवीस किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यालाही भुकेची जाणीव झाली होती. त्यामुळे एक छोटेसे टपरी वजा हॉटेल बघून त्याने गाडी थांबवली. तिथे उतरल्यावर
"खानेमें क्या मिलेगा ?"  त्याने विचारले.
" दाल राईस है |"असे त्यांनी सांगितले.त्याने दोन डिश ऑर्डर केल्या.बाहेर जाऊन तो टपरी मागील मोकळ्या जागेत झुडपांमध्ये जाऊन फ्रेश होऊन आला.आल्यावर त्याने तोंड धुतले. त्याला जरा बरे वाटले.

जानकी मावशीने ही तोंडावर पाणी मारले.ती ही राहुलच्या शेजारी जाऊन बसली.तिला आपल्या शेजारी बसलेले पाहून राहुलच्या कपाळावर आठ्या पडल्या.तो तेथून उठला व दुसऱ्या टेबलावर जाऊन बसला.जानकीला आपले महत्त्व वाढल्या सारखे वाटत होते. मालक आपल्याला सोबत घेऊन आले यामुळे आपण मालकांसाठी महत्वाची व्यक्ती आहोत असे तिला वाटत होते.उगाचच तिची काॅलर ताठ झाली होती.
  आजवर तिचे आयुष्य अशीच स्वयंपाकाची आणि धुणीभांड्याची कामे करण्यात गेले होते.त्यात मालकाचा संबंध फक्त कामापुरताच येत असे. आज मात्र मालक आपल्या गाडीतून तिला सोबत घेऊन निघाला या गोष्टीचे तिला खूप अप्रूप वाटत होते. आपल्याला मालक त्यांच्या जवळचे समजतात असा भ्रम तिच्या मनात तयार झाला होता.त्यामुळेच टपरीमध्ये ती त्याच्या शेजारी जाऊन बसली होती.

राहुल तिला सोबत का घेऊन आला आहे याचे खरे कारण फक्त राहुल लाच माहीत होते.तेवढ्यात समोर डाळ भात आला.दोघांनी खायला सुरुवात केली.खाऊन झाल्यावर राहुलने चहा आणायला सांगितले.चहा पिऊन दोघे पुढच्या प्रवासाला निघाले.अजून अर्धा प्रवास बाकी होता.

अंधार पडला होता.अंधारात गाडी चालवत असताना अचानक एका वळणावर समोरून एक मोटारसायकल वेगाने पुढे आली.बेसावध असल्याने राहुल दचकला.प्रयत्नाने त्याने आपली गाडी बाजूला घेतली.पण त्या टुव्हिलरला वाचवण्याच्या नादात त्याची गाडी कडेला असलेल्या झाडावर आदळली.त्याने गाडीवर कंट्रोल केलेले असल्याने थोडक्यात धडक बसली.तरीही गाडीचे पुढचे बाॅनेट चेपलेच.नंबरप्लेट निखळून पडली.राहुल खूप वैतागला.

आजचा दिवसच भिकार आहे.सकाळपासून मागे काय लागलेय असे त्याला वाटले.त्या मोटारसायकलवरच्या तरुणाला तो खूप बडबडला.त्याची चूक होती त्यामुळे त्याने मुकाट्याने ऐकून घेतले.

खाली पडलेली नंबरप्लेट राहुलने उचलून हातात घेतली.त्याने यावेळी खबरदारी म्हणून स्वतःची गाडी आणली नव्हती. ही गाडी रेंटवर आणली होती.आता गाडीचे झालेले नुकसान त्याला भरुन द्यावे लागले असते. त्याचा विचार आत्ता करायला त्याला फुरसत नव्हती.गाडीचा अपघात झाला आहे हे मालकाला कळवले असते तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा असे त्याने सांगितले असते.पोलिस स्टेशनमध्ये जाणे म्हणजे 'आ बैल मुझे मार' यासारखे झाले असते.त्यामुळे झालेल्या अपघाताबद्दल त्याने गाडीच्या मालकाला काहीच कळवले नाही.

तो पुढच्या मार्गाला लागला.पोटात जरा भर गेल्यामुळे जानकी मावशींच्या डोळ्यांवर गुंगी आली.
शेजारी झोपलेल्या जानकी मावशीकडे पाहून राहुलच्या मनात विचार आला,
"आपल्या सुरक्षेचा विचार करुन हे लोढणे सोबत वावगावे लागतेय.नाहीतर एकट्याने कुठे ही जंगलात रात्र काढता आली असती."
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

राहुलचा पुढचा प्रवास सुरु झाला.खरं तर काहीच शाश्वत नसते.सगळे कायम बदलतच असते.तुमचे कर्म कसे आहे त्यावर तुमचा भविष्य काळ कसा असणार आहे हे अवलंबून असते. राहुलची कर्मे त्याच्या पुढ्यात काय वाढून ठेवतात ते पाहूया पुढील भागात...



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →