Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ४६

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ४६

©® सौ.हेमा पाटील.
क्षमस्व. आजचा भाग पोस्ट करायला वेळ झाला.
मागील भागात आपण पाहिले,निकीता आणि मनिषचे आयुष्य हळूहळू मूळ मार्गावर येऊ लागले आहे.
निकीताने तन्मयला  विचारले होते," राहुलला कधी पकडणार?"
यावर तन्मयने सांगितले,
" सापळा रचला आहे.तो आता त्यात कधी सापडतो ते बघू.इथे नाहीच सापडला तर मुंबईत आहेच की ! तू टेन्शन घेऊ नकोस. आता तुझ्या जवळपासही फिरकणार नाही तो." तिघांच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या.रात्रीचे अकरा कधी वाजले त्यांना समजले नाही.

राहुल विचारांच्या आवर्तनात बुडाला होता.त्याची रात्री शांत झोप लागली नाही.त्याला सारखी जाग येत होती.जानकीमावशी डाराडूर झोपली होती.तिच्याकडे पाहून त्याला राग येत होता.नवरा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ही बाई निवांत घोरत पडलीय.या बायका अशाच असतात.त्याने जानकी मावशीला जोरात हाका मारण्याचा सपाटा लावला.जानकी मावशी दचकून उठली.मालक हाका मारत आपल्याला उठवतात हे पाहून ती वरमली.
ती उठून बाहेर आली.टाॅयलेटकडे जाऊन आली तरीही मालकाला आत बाजेवर बसलेले बघून ती चक्रावली.तिला खरं तर आंघोळ करायची होती. पण मालकाला उठ कसे म्हणायचे असे वाटून ती चटईवर जाऊन बसली.

आधीच वैतागलेला राहुल तिला म्हणाला,
"काय आज पण इथेच मुक्काम करायचा विचार आहे का?"
यावर जानकी मावशीने चमकून त्याच्याकडे पाहिले.

" उठा.चला गाडीत बसा.अजून निम्मे अंतर कापायचे आहे."

चहा नाष्टा मिळेल अशी तिला अपेक्षा होती.भूक लागली होती.आता मालकाला हे कसे सांगायचे असे तिला वाटले.तरीही ती म्हणाली,
"मालक चहा?"

"इथे चाललेय काय आणि तुम्हाला चहा सुचतोय? चला, गाडीत बसा.आणि चहा प्यायचा असेल तर इथेच रहा.मी चाललो."

हे ऐकल्यावर मावशी मुकाट्याने उठली व गाडीकडे आली. तिच्या मागोमाग राहुल पण गाडीकडे आला.त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.

इन्स्पेक्टर सोहनी यांचा सकाळी  सकाळी मनिषला फोन आला. "साडेनऊ वाजेपर्यंत मॅडमना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन या.ओळखपरेड करायची आहे."
"ओके" असे म्हणत त्याने फोन ठेवला.निकीताला सांगितले,
"आपल्याला साडेनऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आहे.त्यामुळे जरा लवकर आटप."

निकीताने तिची तयारी पटापट आटोपली.तन्मयला फोन केला तर त्याने फोन उचलला नाही.मग मनिष शेजारच्या रुममध्ये डोकावला.तर मनिष रुम वर नव्हता.मग दोघांनी जाऊन ब्रेकफास्ट केला.मनिषने मुन्नाला फोन करून हाॉटेलवर बोलावले.दोघांचा नाश्ता होईपर्यंत मुन्ना हाॅटेलवर पोहोचला होता.

दोघे पोलिस स्टेशनवर पोहोचले.इन्सपेक्टर सोहनी आतमध्ये कामात आहेत.आपण बसा. असे तेथील ड्युटी हवालदाराने सांगितले. पंधरा मिनिटांनी ते बाहेर आले.

"नमश्कार. हमें सखाराम की  Identification Parade करवानी है | लेकीन हमें वो जेल में करनी पडेगी | आपको सखाराम जैसा हुलिया होने वाले और छह शक्स में से सखाराम को पहचानना होगा | दो पंच साथ में होंगे | आपकों थोडी तकलीफ दे रहा हूं | अभी पाच मिनिट में हम वहां जायेंगे | "
हे ऐकून मनिष म्हणाला,
"Ohh.. it's alright.
It's our duty as a responsible person."

"Thank you very much for co-operate." असे म्हणून त्यांनी फोन उचलला.फोनवरुन सगळी ॲरेजमेंट केली.
मुन्नाला मनिषने सांगितले,
"हम जरा बाहेर जानेवाले है | तुम घर जाओ | आज तो शाम को हम बाहर जानेवाले नहीं है | ये लो तुम्हारा आज का रेंट |"
"पैसा रहने दो साब | आज आपको मैंने कहां  घुमाया है?"
"ऐसे कैसे चलेगा? ये तुम्हारी रोजीरोटी है |" असे मनिष म्हणाला व त्याने मुन्नाच्या हातात पैसे कोंबले.

मुन्ना निघून गेला आणि पोलिस जीप आली.इन्स्पेक्टर सोहनींनी दोघांना गाडीत बसा अशी विनंती केली.दोघे गाडीत बसले.त्यानंतर सोहनी बसले आणि गाडी जेलच्या दिशेने धावू लागली.

तिथे पोहोचल्यावर prison officer ने  मनिष व निकीताला ऑफीसमध्ये बसवले.चहा काॅफी काही हवंय का विचारले. दुरून जेल आतून कसा असतो ते दाखवले.तुरुंगातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या दालनात नेले. मनिषने तिथून कापडी पिशव्या खरेदी केल्या. ऑफीसरने सांगितले,
"दिवाळीच्या वेळी उटणे, सुशोभित दिवे तयार करतात.बाहेर मार्केट मध्ये पण विक्रीसाठी पाठवले जाते."
तिथेच बाहेरच्या बाजूला दोडका, वांगी, मिरच्या, दुधी भोपळा,लिंबू इत्यादी विक्रीसाठी ठेवले होते.कैद्यांच्या श्रमदानातून हे पिकवले जाते असे ऑफीसरने सांगितले.

इन्स्पेक्टर साहेबांनी बोलावलेय असा निरोप आला आणि निकीताला एकटीलाच आत बोलावले. मनिष बाहेरच थांबला.आत एका रुममध्ये निकीताला नेण्यात आले.तिथे आधीच दोन व्यक्ती बसल्या होत्या.त्या पंच म्हणून बोलावल्या होत्या.
त्यानंतर बाहेरच्या बाजूला सातजणांना ओळीने उभे करण्यात आले. निकीता व आत बसलेले दोन पंच यांना ते सातजण दिसत होते,पण त्या सातजणांना निकीता आणि पंच दिसत नव्हते.

  सगळ्यांची वेशभूषा, केशभूषा अगदी समान होती. देहयष्टी आणि चेहऱ्यातही बऱ्यापैकी साम्य होते.यापैकी सखाराम कोण हे निकीताला ओळखायचे होते.तीन नंबरची व्यक्ती सखाराम आहे हे निकीताने सांगितले.परत थोड्या वेळाने पुन्हा एकदा तिला विचारण्यात आले.यावेळी त्यांचा उभे रहाण्याचा क्रम बदलण्यात आला होता.यावेळी तिने शेवटच्या नंबरवर सखाराम उभा आहे असे सांगितले.अजून एकदा क्रम बदलून ओळख परेड झाली.यावेळीही निकीताने सखारामला अगदी बरोबर ओळखले.त्याऩंतर तिची सही घेण्यात आली.त्यावर दोन उपस्थित असलेल्या पंचांची सही घेण्यात आली.त्यानंतर इन्स्पेक्टर सोहनी यांनी जीपचालकाला या दोघांना हाॅटेलवर सोडून ये असे सांगितले.

  दोघेजण हाॅटेलवर परतले तरीही तन्मय परतला नव्हता.सकाळपासून हा कुठे गेला असेल असे मनिषला वाटले.त्याची काळजी वाटली म्हणून त्याने तन्मयला मेसेज केला,
" कुठे आहेस? ठीक आहेस ना?"
सकाळपासून चारवेळा फोन केला होता,पण त्याने उचलला नव्हता. आता मेसेज पाहून तो नक्कीच रिप्लाय करेल असे मनिषला वाटले.दोघांनी जेवणाची ऑर्डर केली व फ्रेश होऊन दोघे जेवणाची वाट पहात बसले.

तेवढ्यात मनिषला तन्मयचा मेसेज आला.
"मी ठीक आहे.कामात आहे.रात्री यायला उशीर होईल."  ते वाचून किमान संपर्क तरी झाला म्हणून मनिषचा जीव भांड्यात पडला.
जेवण आल्यावर दोघांनी खाऊन घेतले आणि दमल्यामुळे दोघेही वामकुक्षीसाठी बेडवर आडवे झाले.

निकीताच्या नजरेसमोर जेलमधील दृष्य उभे राहिले.
"आज ना उद्या केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा होतेच.हे माहीत असूनही माणसे अशी का वागतात?" असा विचार तिच्या मनात आला.

  राहुलने सात महिलांचे अपहरण केले.या कृत्याने त्याने सात तरुणींचे भावविश्व उजाडून टाकले.याचाच अर्थ सात दुणे चौदा कुटुंबांतील व्यक्तींना अवहेलनेला तोंड द्यावे लागले.त्या तरुणींच्या आईवडिलांना किती दुःख झाले असेल असे निकीताला वाटले.
   लग्न होऊन आठवडा झाला नाही तर मुलगी बेपत्ता होते म्हणजे मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. तिचेच काहीतरी लग्नाआधी अफेअर सुरु असेल म्हणून ती पळून गेली असेल अशीच चर्चा सुरू होत असेल. काहीच दोष नसताना सर्वांना नामुष्कीचा सामना करावा लागला असेल. तरुणींच्या नवऱ्याला पण कुत्सित नजरांना सामोरे जावे लागले असेल.कसे वाटले असेल त्यांना? असा विचार मनात येऊन तिच्या मनात करुणा दाटून आली.आणि राहुलबद्दल अजूनच चीड मनात उत्पन्न झाली.
क्रमशः©® सौ.हेमा पाटील.




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →