Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ४४

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ४४

©® सौ.हेमा पाटील.

पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आज निकीता आणि आपण सोबत आहोत याचा मनिषाला आनंद झाला आहे. आयुष्यात अपघात घडत असतात.त्याच्या स्मृती सोबत घेऊन जगणे शहाणपणाचे नाही एवढे व्यवहारज्ञान त्याला खचितच होते.अर्थातच जखम ओली असेल तर भळभळतेच हेही त्याला मान्य होते.त्यामुळे आपण स्वतः हून निकीताला काहीच विचारायचे नाही असे त्याने ठरवले होते.ती स्वतः हून काही बोलली तर जास्त रिॲक्ट न होता ऐकून घ्यायचे. तिला मानसिक आधार द्यायचा.चुकूनही आपल्या तोंडून एकही वागवा शब्द जाता कामा नये ज्यामुळे निकीता दुखावली जाईल यासाठी तो काळजी घेत होता.

  आजची रात्र दोघांसाठीही अविस्मरणीय अशीच होती.चार दिवस बेपत्ता असलेली निकीता परत आल्याने आज तिला आपल्या कुशीत घेऊन मनिष शांतपणे झोपला होता.सकाळी जाग आल्यावर निकीताच्या निर्व्याज चेहऱ्याकडे पाहून त्याला वाटले,पत्नी ही आपली आयुष्याची जोडीदार असते.शरीराची भूक भागविणे एवढ्यापुरतेच नर नारीचे नाते नसते. त्यापलिकडेही सहवासाची भूक असते.एकमेकांना परस्परांचा आधार वाटत असतो. मानसिक भूक असते.वैचारिक देवाणघेवाण असते.या सगळ्यातून एक मजबूत नाते निर्माण होते.आणि स्पर्श हा फक्त देहाची गरज भागवण्यापुरता नसतो. खूपदा पती पत्नीच्या एकमेकांना मारलेल्या मिठीत वासनेचा लवलेशही नसतो.आपल्या माणसाची मिठी हे जगातील सर्वात उत्तम ठिकाण आहे मग ते झोपडीत असो की महालात.

थोड्यावेळाने निकीता ची झोप चाळवली.तोपर्यंत जाग येऊनही मनिष तसाच तिला आपल्या मिठीत घेऊन पडून राहिला होता.आपल्या उठण्याचे तिची झोपमोड होईल असे त्याला वाटले.

निकीताने डोळे उघडले.आपल्याला मिठीत घेऊन झोपलेल्या मनिषकडे पाहून तिने स्मित केले.
"गुडमाॅर्निंग ! "असे मनिष म्हणाला.
"व्हेरी गुड मॉर्निंग!" निकीता ने प्रत्युत्तर दिले.तिच्या कपाळावर किस करुन मनिष म्हणाला,
"चल,उठतो आता."
निकीता म्हणाली,
"चार दिवस तुझी मिठी खूप मिस केलीय. झोपूदे ना आणखी थोडा वेळ!"
"ओके.झोप. तुला जेव्हा उठावेसे वाटेल तेव्हा उठूया."असे म्हणत त्याने तिच्या डोक्यावर थोपटले.
असाच थोडावेळ गेला आणि मनिषचा मोबाईल वाजला.हात लांब करुन त्याने मोबाईल घेतला तर तन्मयचा फोन आला होता.त्याने फोन रिसिव्ह केला.
"काय झाली का झोप ?" तन्मय तिकडून विचारत होता.
"नाही उठलो अजून." मनिष म्हणाला.त्या दोघांचे संभाषण ऐकून निकीता उठून बसली.आपल्याला तन्मयला माहिती द्यायची आहे हे तिला आठवले.
दोघेजण आवरुन खाली ब्रेकफास्टला निघाले तेव्हा मनिषने तन्मयला फोन केला.तन्मयही त्यांच्यासोबत खाली गेला.पोटभर नाश्ता करुन तिघेही परत वर रुमवर आले. तन्मयला हवी असणारी माहिती निकीताला द्यायची होती. मनिष शांतपणे दोघांचे बोलणे ऐकत बाजूला बसला.
तन्मयने सांगितले,
"तू पोलिस स्टेशनमध्ये जो जबाब दिला आहे तो त्यांनी रेकॉर्ड केला आहे.मी बारकाईने तुझा जबाब ऐकला आहे. तो ऐकूनही काही प्रश्न बाकी आहेत.तेवढेच मी तुला विचारणार आहे."
निकीताने चालेल म्हणून मान डोलावली.

"पहिला प्रश्न:- तुला मधु म्हणून हाक मारणारी व्यक्ती राहुलच होती का?"

"हो.तोच होता.सकाळी मी जेव्हा माॅर्निंग वाॅकला गेले होते तेव्हा मला मधु मधु अशा हाका ऐकू आल्या होत्या. आपल्यासारखेच कुणीतरी जोडपे फिरायला आले असेल.त्यातील स्त्रीचे नाव मधु असावे असे मला वाटले होते.पण मी जेव्हा रुमवर परत आले तेव्हा आंघोळीनंतर केस सुकविण्यासाठी बाल्कनीत उभी होते तेव्हाही मला मधु मधु अशा हाका ऐकू आल्या. कुणीतरी आपल्यालाच उद्देशून हाका मारत आहे असे वाटून मी घाबरले.खाली एक व्यक्ती मला उभी असलेली दिसली. मी आत धावत येऊन मनिषला उठवले.पण तेव्हा मी इतकी घाबरले होते की माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मनिष झोपेत असल्याने त्याच्या काही लक्षात आले नाही. आणि परत हे सगळे मनिषला सांगायचे राहूनच गेले. मुन्नाच्या गाडीत हा पुढे बसला होता.आणि परत माझी भीतीही कमी झाली होती.आपला गैरसमज झाला असावा असेच मला वाटले होते."
"तू तेव्हा मनिषला हे सांगायला हवे होते. कदाचित पुढचा अनर्थ टळला असता.असो."

"मलाही या गोष्टीचा पश्चात्ताप झाला. जेव्हा आम्ही बाजारपेठेत गेलो होतो तेव्हा फोन आला म्हणून मनिष बाहेर आला होता.तेव्हा दुकानात राहुल उपस्थित होता.तेव्हाच काय सकाळी आम्ही हाॅटेल सोडले तेव्हापासून तो आमच्या मागावर होता.सकाळी जेव्हा मुन्नाची गाडी आली तेव्हा मी इकडे तिकडे पाहिले होते तेव्हा हा मला एका झाडाखाली उभा असलेला दिसला होता.पण तेव्हा मला याचा संशय आला नव्हता."

"इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव. अनोळखी ठिकाणी एकटीने अजिबात बाहेर पडायचे नाही. तसेच मोबाईल एका मिनिटासाठी सुद्धा दूर ठेवायचा नाही.तुझा मोबाईल जवळ असता तर तो क्षण कदाचित चुकवता आला असता."
यावर निकीता म्हणाली,
"खरंच आहे.क्षुल्लक वाटणाऱ्या या चुकांमुळे आपणच आपल्या मार्गावर संकटे पेरतो."
"बरं आता एक सांग.तुला घेऊन जाण्यामागे राहुलचा उद्देश काय होता? तुला काय वाटते?"
"त्याला माझ्यासोबत हनिमून साजरा करायचा होता.त्याने दोन तीनदा हे बोलून दाखवले होते."
"त्याचे लग्न झाले होते का?"
"याबाबत मला काही समजले नाही.पण त्याचे मुंबईत हाॅटेल आहे.तो मुंबईत रहातो एवढे समजले.आणि हो...एका फाईल मध्ये सात मुलींचे  एकेका पानावर नंबर टाकून फोटो चिकटवले होते.त्याखाली त्या मुलींची नावे लिहिली होती.
एक नंबरवर अनिता होती.दोन नंबर वर रश्मी,तीन नंबरवर अंजु,
चार नंबरवर शीतल, पाच नंबरवर हर्षा,सहा नंबर वर ज्योतिका, सात नंबर वर सानिका... आणि आठ नंबर पानावर त्याने माझे नाव लिहिले होते पण फोटो चिकटवला नव्हता."

तिने सांगितलेली नावे तन्मयने क्रमाने नोंद करुन घेतली.
"आणखी काही सांगायचे आहे का जे तुला वेगळे वाटले?"

"हो. मला त्याने डांबून ठेवले होते.मनात आणले असते तर तो कधीही माझ्याशी अतिप्रसंग करु शकत होता.एकदा मी दाराला आतून कडी घातली तेव्हा त्याने धडका देऊन दाराची कडी निखळली.त्यावेळी त्याने मला बाहुपाशात उचलून घेऊन स्वतःच्या रुममध्ये नेले होते.
तो म्हणाला होता,की तुझे सौंदर्य आत्ताच कुस्करावे असे वाटतेय.पण मला तुझ्यासोबत हनिमून साजरा करायचा आहे.त्यामुळे मी रात्रीपर्यंत शांत रहाणार आहे.रात्री मावशी तुला नवरी सारखे सजवतील.तेव्हा मी तुझा उपभोग घेईन. हे त्याचे वागणे माझ्या जरी पथ्यावर पडले असले तरी मला विचित्रच वाटले होते.ज्या हेतूने अपहरण केले आहे तो पूर्ण करायचा सोडून हातात आलेल्या सावजाकडे असे दुरून पहाणे मला वेडेपणाचे वाटले होते."
हे ऐकून तन्मय म्हणाला,
"That's the point. प्रत्येक गुन्हेगाराचे गुन्हा करण्यामागे काही कारण असते. त्या कारणामुळे तो तशाच पद्धतीने गुन्हे करत जातो. याच्या मुळाशी पण काहीतरी कारण असणार आहे.त्याचा शोध घेतला पाहिजे."
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील
तन्मय आता राहुलचे गुन्ह्याचे अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहे.यासाठीच तो निकीता कडून बारीक बारीक दुवे गोळा करुन जोडत आहे. पाहूया पुढे काय होते ते...



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →